कला शाखेचा निकाल घटला   

पुणे : राज्य मंडळाच्या बारावीच्या कला शाखेच्या निकालात सातत्याने घट होत आहे. गेल्या चार वर्षात हा निकाल १० टक्क्यांनी घटला आहे. त्याचप्रमाणे एकाच वर्षात हा निकाल पाच टक्क्यांनी घटला आहे. हा निकाल घटण्याची कोणतेही ठोस कारण नसल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे. मात्र, अकरावीला विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा ओढा वाढल्याने, कला शाखेत उर्वरित विद्यार्थी प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांकडून अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष न दिल्याने, अनुत्तीर्णांचे प्रमाण वाढत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.
 
राज्य मंडळाच्या बारावीच्या परीक्षेतील कला शाखेच्या निकालात कमालीची घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. त्या तुलनेत विज्ञान आणि वाणिज्य शाखेमध्ये उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात फारसा बदल झालेला नाही. गेल्या चार वर्षात या शाखेच्या निकालात साधारण एक टक्क्यांचा फरक पडल्याचे दिसून येते. त्याचवेळी कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण हे ९.९९ टक्क्यांनी घटले आहे. गेल्यावर्षी बारावीच्या परीक्षेच्या निकालात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५.८८ टक्के होते, तर यंदाच्या निकालात ते ८०.५२ टक्के झाले आहे. त्यामुळे एकाच वर्षात हे प्रमाण ५.३६ टक्क्यांनी कमी झाले आहे. कला शाखेतील उत्तीर्णांचे प्रमाण घटणे ही कला शाखेसाठी धोक्याची घंटा असल्याचे सांगितले जात आहे. याचा थेट परिणाम हा पदवी अभ्यासक्रमांवर होणार असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. विज्ञान आणि वाणिज्य शाखेतून उच्चशिक्षण घेतल्यानंतर, रोजगाराच्या आणि नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध होतात. मात्र, त्या तुलनेत कला शाखेतून शिक्षण घेतल्यानंतर, उपलब्ध होत नाहीत. 
 
कला शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण घटण्याचे ठोस कारण सांगता येणार नाही. मात्र, दहावीत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा ओढा हा विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे वाढला आहे. त्यानंतर विद्यार्थी कला शाखेत प्रवेश घेत असल्याचे चित्र आहे.
 
- शरद गोसावी, अध्यक्ष

Related Articles